नगर - आजच्या पिढीवर चांगले संस्कार होण्याची गरज, पालक मुलांना शाळेत घालून मोकळे होतात, शिक्षक पुर्वीसारखे जीव तोडून शिकवत नाहीत, विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी समजत नाही, शाळेत फळ्यावर सुविचार लिहितांना आपण नेहमी खरे बोलावे, गुरुंविषयी आदर ठेवावा, हे फक्त वाचण्यापुरते आहे, कृतीमधून ते घडत नाही. सध्या मुलांवर अध्यात्मिक संस्काराची गरज आहे. तेव्हा शाळेत सुविचार ऐवजी हरिपाठातील ओवी लिहिण्याची गरज आहे, असे विचार हभप निवृत्तीनाथ महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी समाजप्रबोधनपर किर्तनातून विचार मांडले.
नगर तालुक्यातील देवगांव येथे स्व.गणेश विश्वनाथ शिंदे व राधाजी गेणु शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हभप इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, दादाभाऊ चितळकर, बाबासाहेब खर्से, विपुल शेटीया, संभाजी पवार, संदिप कर्डिले आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
हभप इंदोरीकर पुढे म्हणाले, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचे निष्क्रीयता वाढत आहे. सध्या सर्वच क्षेत्रात नितीमत्ता बदलत आहे. त्यामुळे प्रगती ऐवजी अधोगत होत चालली आहे. धर्मावर संकट आहे. तेव्हा धर्म वाचवा. धर्म वाचला तर माणसे वाचतील अन् माणसे वाचली तर संप्रदाय धर्म वाढेल, असे सांगून ते म्हणाले, मी 10 वर्षापुर्वी किर्तनातून सांगत होतो. हुंडा प्रथा बंद होईल, लग्नाला मुली मिळणार नाही, ज्या मिळतील त्यांना हुंडा देत लग्न करवून घ्यावे लागेल. ही परिस्थिती आहे. आजही पुन्हा सांगतो, अजून पाच वर्षांनी खूप भयावह अवस्था होईल, तेव्हा परमार्थ करा, पैशासाठी रक्ताची नाती तोडू नका. हीच नाती वेळप्रसंगी आपणास उपयोगी येणार असल्याचा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी उपस्थित मान्यरांनी स्व.गणेश शिंदे व स्व.राधाजी शिंदे यांच्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.
Post a Comment