केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवर कपात करावी : भाजपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
राज्य सरकार स्वत:चे अपशय झाकण्यासाठी नेहमीच
केंद्र सरकारकडे बोट दाखवते - भैय्या गंधे
नगर - केंद्रातील मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणीसाठी नगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अॅड.विवेक नाईक, युवराज पोटे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, शिवाजी दहिंडे, मनेष साठे, धनंजय जामगांवकर, प्रशांत मुथा, अमित गटणे, शशांक कुलकर्णी, सुमित बटुळे, विलास गांधी, लक्ष्मीकांत तिवारी, सुनिल पांडूळे, आदेश गायकवाड, पंकज जहागिरदार, हुजेफा शेख, ऋग्वेद गंधे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, राज्य सरकार स्वत:चे अपशय झाकण्यासाठी नेहमीच केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. परंतु केंद्र सरकारने चांगल्या योजना राबविल्या त्यांची अंमलबजावणी राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे परंतु तसे होतांना दिसत नाही. फक्त पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बाऊ करुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न हे आघाडी सरकार करत आहे. आता ज्याप्रमाणे केंद्राने पेट्रोल - डिझेलच्या दरात जशी कपात केली तशी राज्य सरकारनेही कपात करुन जनतेला दिलासा देण्याचे काम करावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोलवरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलीटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रतिलीटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता, महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे.
आपल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल - डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलने केली होती. आता मोदी सरकारने पेट्रोल - डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आपल्या आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे, ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे. तथापि, अजूनही आपल्या सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपाशासित राज्यांनी नागरिकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही, याची नोंद घ्यावी.
राज्यात डिझेलवर 24 टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर 25 टक्के व्हॅट आकारला जातो. त्या खेरीज पेट्रोलवर प्रती लिटर नऊ रुपये सेसही आहे. यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रतिलीटर सेसचा समावेश आहे. राज्य सरकारला पेट्रोल डिझेलवर करापोटी तीस ते चाळीस रुपये प्रति लिटर मिळतात.
आमची मागणी आहे की, आपल्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट कमी करून मोदी सरकारप्रमाणेच पेट्रोलसाठी पाच रुपये तर डिझेलसाठी दहा रुपये सवलत द्यावी.
तसेच, राज्यात दुष्काळी स्थिती नाही, त्यामुळे पेट्रोलवरील प्रती लीटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा. ही कपात व्हॅट कमी केल्यामुळे मिळणार्या सवलतीशिवाय अतिरिक्त असावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना दिले.
--------
Post a Comment