आणीबाणीच्या कडवट आठवणी
शुक्रवारी ‘भाजपा’ काळा दिवस पाळणार - महेश तवले
नगर - स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणार्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या काहण्या देशातील तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी 25 जून रोजी भाजपा तर्फे राज्यभर काळा दिवस पाळण्यात येणार असून यानिमित्त विविध संवाद कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांचे संयोजन राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चा करीत आहे. नगरमध्येही या कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांनी दिली.
25 जून 1975 या दिवशी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली, आणि देशभर दमन सत्र सुरू झाले. अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात काँग्रेसने सत्तेचा व बळाचा अमानुष वापर करून देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण केले. मानवाधिकारांचे व माध्यमस्वातंत्र्याचे हनन करणार्या या काळातील काँग्रेसी अत्याचारांची काहणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 25 जून रोजी राज्यात जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीने व्हिडियो कॉन्फऱन्स, पत्रकार परिषद व समाजमाध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणीवा समाजास करून देण्यात येतील. आणीबाणीसारखा कडवट काळ देशात पुन्हा कधीच येऊ देणार नाही असा निर्धार राज्यातील हजारो तरुण व भाजप कार्यकर्तेया दिवशी करतील. त्या काळ्या दिवसांतील अत्याचाराच्या कटु प्रसंगांची देशातील तरुणांना वेळोवेळी आठवण करून दिली तरच हा निर्धार टिकेल व लोकशाहीचे संरक्षण होईल, त्यामुळे देशातील तरुणांना स्वतंत्र भारताच्या इतिहासातील त्या काळ्या दिवसाची माहिती असणे व त्यातून धडा घेणे गरजेचे आहे अशी भाजपची भावना आहे, असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले.
आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस सरकारने माध्यमांची आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली. देशाच्या सुरक्षेचा कांगावा करून अनेक विरोधी नेत्यांना व लाखो लोकांना तुरुंगात डांबले. आणीबाणीच्या विरोधात तेव्हा तत्कालीन जनसंघाच्या नेत्यांनी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी देशभर प्रखर आंदोलने करून जनजागृती केल्याने दडपशाहीच्या या लोकशाहीविरोधी कारवाईपासून इंदिरा गांधी यांना माघार घ्यावी लागली होती. राष्ट्रप्रेमी संघटित शक्तीपुढे दडपशाही प्रवृत्तीचा टिकाव लागत नाही, याची जाणीव जागी ठेवण्याकरिता 25 जूनला काळा दिवस पाळण्याचे भाजपाने ठरविले आहे, असेही .महेश तवले म्हणाले
Post a Comment