शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांचे केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना निवेदन
नगर, (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यातील राहुरी, पारनेर व नगर तालुक्यातील लष्कराच्या प्रस्तावित के. के. रेंज क्षेत्राच्या अधिग्रहणबाबत केंद्रीय संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून या संदर्भात परिपत्रक काढून शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांना मेलवर पाठविण्यात आल्याचे लहामगे यांनी सांगितले.
नगर, पारनेर व राहुरी तालुका हद्दीचा समाविष्ट असलेल्या नगरजवळील लष्कराच्या के. के. रेंज या युद्ध प्रशिक्षण व सराव क्षेत्राच्या विस्तारीकरणाच्या हालचाली सुरूच आहेत. याबाबत अद्यपर्यंत संरक्षण विभागाकडून काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच के.के. रेंज 2 चा विचार वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ज्या-ज्या वेळी विस्तारीकरणाचा मुद्दा पुढे येतो, त्या वेळी नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील शेतकरी धास्तावून जातात. करण के. के. रेंज परिसरात नगर, राहुरी व पारनेर तालुक्यांतील 23 गावांतील क्षेत्राचे अधिग्रहण केले जाणार असल्याची चर्चा होते.
जमीन अधिग्रहणला तीनही तालुक्यातील शेतकर्यांचा तीव्र विरोध असल्याने सध्या हा विषय संवेदनशील बनला आहे. युद्धसराव क्षेत्रासाठी आता शेतकर्यांची जमीन अधिग्रहित करू नये अशीच सर्वांची इच्छा आहे. के. के. रेंजसाठी जमिनीचे अधिग्रहण होईलच अशी कधी चर्चा होते तर कधी जमिनीचे अधिग्रहण होणार नाही असे लोकप्रतिनिधीमार्फत सांगितले जाते. प्रशासनाच्या पातळीवरून मात्र याबाबत अधिकृतरित्या शेतकर्यांना काहीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शेतकर्यांच्या जमिनी युद्धसरावसाठी अधिग्रहित करू नयेत अशी शिवसेनेच्या व स्थानिक शेतकर्यांची मागणी आहे. या विषयाकडे गांभीर्याने पाहून अधिग्रहनाबाबत शेतकर्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दूर करावा. के.के. रेंज संदर्भात आता थेट केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने भूमिका जाहीर करून परिपत्रक काढावे व नगर, राहुरी व पारनेर तालुक्यातील शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी शवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.

Post a Comment